
जळगाव (प्रतिनिधी): आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा यांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी जिल्हास्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे.
कुंभमेळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविक नाशिककडे जाणार असल्याने रस्ते, रेल्वे आणि इतर सार्वजनिक सुविधांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी समितीची रचना करण्यात आली आहे.
समितीत पोलिस विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे प्रशासन, महसूल विभाग तसेच इतर संबंधित शासकीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी असतील. समितीच्या कामकाजासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कुंभमेळ्याच्या काळात वाहतूक व्यवस्थापन, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना, आरोग्य सेवा, आपत्कालीन प्रतिसाद आणि माहिती प्रसारण यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच विविध विभागांमध्ये नियमित समन्वय ठेवून आवश्यक नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे काम समितीकडून केले जाणार आहे.



