वाघोड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे सत्कार सोहळा उत्साहात

रावेर (प्रतिनिधी): वाघोड येथे केसरबाई महाराष्ट्र फाऊंडेशनच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन स्वामी समर्थ केंद्राच्या सभागृहात करण्यात आले होते.
कार्यक्रमात तालुक्यातील विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागील पालक व शिक्षकांचे योगदानही यावेळी मान्यवरांनी विशेष अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भविष्यातही मेहनत, सातत्य आणि शिस्त यांच्या बळावर अधिक मोठे यश मिळविण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार अमोल जावळे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष जे. डी. पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रतापराव महाजन, माजी जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन अतुल बिंदुकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



