
रावेर (प्रतिनिधी): वाघोडा–दसनूर–रिंगणपूर–बलवाडी या मार्गावरील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून, काही ठिकाणी नाल्यावरील बांधकाम तुटल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, या मार्गाचा वापर शेतीमाल, विशेषतः केळी आणि इतर पिकांच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र रस्त्यावरील तुटलेल्या भागामुळे मोठी वाहने सुरक्षितपणे जाऊ शकत नसल्याने शेतमाल बाजारात पोहोचविणे कठीण झाले आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतुकीचा वेळ वाढत असून अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी किंवा कमी दृश्यमानतेत अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
संबंधित विभागाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच दर्जेदार काम करून भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




