संरक्षक भिंतीअभावी मोठे वाघोदा शाळेची सुरक्षा धोक्यात; परिसरातून शॉर्टकट मार्गाचा वापर

रावेर (प्रतिनिधी): येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला संरक्षक भिंत व प्रवेशद्वार नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शाळेच्या परिसरातून नागरिकांचा मुक्त वावर होत असल्याने परिसराचा वापर सार्वजनिक शॉर्टकट मार्गाप्रमाणे केला जात आहे.
शाळेभोवती असलेली संरक्षक भिंत अनेक ठिकाणी पडझड झालेली असून त्यामुळे भटक्या जनावरांचा व इतर व्यक्तींचा परिसरात सहज प्रवेश होत आहे. परिणामी शाळेतील शैक्षणिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक व पालकांनी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यात शाळेतील काही वर्गखोल्यांमध्ये गळती होत असून पाण्याचा शिरकाव वाढला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून शैक्षणिक साहित्याचेही नुकसान होत आहे.
तसेच शाळेच्या परिसरातील काही भागात स्वच्छतेचा अभाव असल्याने साप व उंदरांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिक, पालक व ग्रामस्थांनी शाळेला तातडीने संरक्षक भिंत व प्रवेशद्वार उभारून आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी केली आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व चांगले शैक्षणिक वातावरण मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



