
रावेर (प्रतिनिधी): केळी निर्यातीला अधिक गती मिळावी यासाठी तालुक्यात शीतसाखळी सुविधा उभारण्याबाबत प्रशासन आणि संबंधित संस्थांकडून सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी रावेर बाजार समितीत केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत केळी साठवणूक, प्रक्रिया व निर्यातीसाठी आवश्यक कोल्ड स्टोरेज तसेच आधुनिक सुविधा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली. विशेषतः रावेर, यावल, चोपडा व परिसरातील केळी उत्पादकांना याचा मोठा फायदा होईल, असे मत उपस्थितांनी मांडले.
यावेळी केळी निर्यातीसाठी रेल्वे टर्मिनल उभारणीचा मुद्दाही चर्चेत आला. मुंबईसह मोठ्या बाजारपेठांमध्ये कमी वेळेत केळी पोहोचवण्यासाठी रावेर परिसरात रेल्वे टर्मिनल उभारण्याची मागणी करण्यात आली. यामुळे वाहतूक खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळू शकतो, असे सांगण्यात आले.
शेतकरी प्रतिनिधींनी तालुक्यातील केळी उत्पादनाचे मोठे प्रमाण लक्षात घेता प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज आणि निर्यातसंबंधित सुविधा वाढवण्याची आवश्यकता व्यक्त केली. प्रशासनानेही या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत पुढील कार्यवाही करण्याचे संकेत दिले आहेत.



