
रावेर (प्रतिनिधी) : कोचूर खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती संतोष कोळी यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले आहे. संबंधित आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
ज्योती कोळी यांनी अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून निवडणूक जिंकली होती. नियमानुसार निवडून आल्यानंतर निश्चित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. मात्र, निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले.
तसेच, जात पडताळणी प्रक्रियेसाठी संबंधित समितीकडे प्रस्ताव दाखल करण्यात आलेला नसल्याची माहितीही अधिकृत पत्राद्वारे देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्यांनी आक्षेप नोंदविल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली.
दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून पुढील प्रशासकीय प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



