
जळगाव (प्रतिनिधी) : वाढत्या उष्णतेमुळे घरांमध्ये कुलरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, निष्काळजीपणामुळे विद्युत अपघात होण्याचा धोका संभवत असल्याने नागरिकांनी कुलर वापरताना आवश्यक सुरक्षितता पाळावी, असे आवाहन वीज विभागाकडून करण्यात आले आहे.
कुलर वापरताना योग्य दर्जाचे प्लग आणि वायरिंग वापरणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. कुलरमध्ये पाणी भरताना किंवा साफसफाई करताना वीजपुरवठा बंद करून प्लग काढणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. तसेच पाणी सांडणार नाही याची काळजी घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
तज्ज्ञांच्या मते, ओल्या हाताने कुलर हाताळणे टाळावे तसेच वायरिंग आणि कनेक्शन वेळोवेळी तपासून घ्यावेत. योग्य अर्थिंग असल्यास विद्युत धक्का बसण्याचा धोका कमी होतो. जीर्ण किंवा खराब वायर त्वरित बदलण्याची आवश्यकता असल्याचेही सांगण्यात आले आहे.
लहान मुलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले असून मुलांना कुलरजवळ खेळू न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दुरुस्ती किंवा कुलर हलवण्यापूर्वी वीजपुरवठा पूर्णपणे बंद करणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले.
योग्य काळजी आणि सुरक्षिततेचे नियम पाळल्यास उन्हाळ्यात कुलरचा वापर अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर ठरू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.




