
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विविध 23 ठिकाणी जनावरांमध्ये लंम्पी स्किन (कातडी सदृश) आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले असून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. लंम्पी नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता सतर्क राहून प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनानांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी बुधवार, 23 जुलै रोजी पारोळा आणि एरंडोल तालुक्यातील खेड्यांचा दौरा करून लसीकरण मोहिमेची पाहणी केली. या वेळी त्यांनी स्थानिक पशुपालकांशी संवाद साधून लंम्पी आजाराबाबत आवश्यक मार्गदर्शन केले.या वेळी त्यांचे समवेत पशुसंवर्धन उपायुक्त डॉ प्रदीप झोड यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 166 जनावरे लंम्पीने बाधित झाली असून त्यापैकी 50 जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. सद्यस्थितीत 66 जनावरे बाधित असून 6 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर विशेष भर देत सतत निरीक्षण आणि नियंत्रण उपाययोजना सुरू केल्या आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले की, लंम्पी आजार हा संसर्गजन्य नाही. या आजाराची माणसांमध्ये कोणतीही लागण होत नाही. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. दूध उकळून प्यावे, कोणताही संभ्रम बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले.
प्रशासनामार्फत जनजागृती, लसीकरण आणि उपचार मोहिमांना वेग दिला जात असून पशुपालकांनी प्रशासनाशी सहकार्य करावे, अशी आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.