
रावेर (प्रतिनिधी): ग्रामपंचायतीच्या २६ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या ग्रामसभेतील ठरावाबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या चौकशीसंदर्भात आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न झाल्याने चौकशी अहवाल पाठविण्यास विलंब होत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक दस्तऐवज तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पंचायत समितीकडून प्राप्त माहितीनुसार, २२ मे २०२५ रोजी या तक्रारीची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी तक्रार अर्जाशी संबंधित कागदपत्रे तसेच विविध योजनांशी निगडित अभिलेखांच्या प्रमाणित प्रती निश्चित मुदतीत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
मात्र, अद्याप काही आवश्यक कागदपत्रे प्राप्त न झाल्याने चौकशी पूर्ण करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या विलंबासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करण्याचे निर्देश
गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधितांना आवश्यक अभिलेख विलंब न लावता सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा शिस्तभंगात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर करून चौकशी अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.



