आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेणे होणार सोपे

दवाखान्यांची यादी लागणार ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर
जळगांव, (प्रतिनिधी ) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून जिल्ह्यात “आयुष्यमान भारत योजना लाभप्राप्त दवाखान्यांची यादी” ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर लावण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 1159 ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभ उपलब्ध असलेल्या 90 दवाखान्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामुळे गावपातळीवर नागरिकांना सहजपणे माहिती मिळणार असून, योजना लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या परिसरातील आयुष्यमान भारत लाभप्राप्त दवाखान्यांची माहिती मिळणार आहे तसेच विविध आजारांवर मोफत व सुलभ उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या योजनेची वैशिष्ट्ये :
देशातील गरीब व गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार रुग्णालयीन सेवा पुरवणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. योजने अंतर्गत दरवर्षी रु. 5 लाखांपर्यंत मोफत रुग्णालयीन उपचार – एका कुटुंबासाठी,सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा, 1350 पेक्षा जास्त रोगांवर मोफत उपचार – जसे की हृदयरोग, कॅन्सर, मूत्रपिंड विकार, अपघाती उपचार इ.,कॅशलेस (Cashless) आणि पेपरलेस (Paperless) प्रक्रिया, उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्यापूर्वी व नंतरची देखील सेवा (pre and post hospitalization), ई-कार्डद्वारे ओळख – लाभार्थीला आधार कार्ड/राशन कार्ड द्वारे ओळखले जाते.
या आजारांवर मिळतात उपचार – सर्जरी (हृदय, मेंदू, डोळे, मूत्रपिंड, हाडे इ., प्रसूती सेवा, कॅन्सर, किडनी डायलेसिस, अपघातानंतरचे उपचार,बालरोग व स्त्रीरोग,मेंदू विकार, दमा, मधुमेह इ.
योजना लाभ मिळवण्यासाठी काय करावे ?
जवळच्या सेवा केंद्रावर (CSC) किंवा आरोग्य सहाय्यक केंद्रात जाऊन नाव तपासावे,पात्र असल्यास आयुष्मान भारत कार्ड तयार करून घ्यावे,लाभार्थी रुग्णालयात दाखल झाल्यास कॅशलेस सेवा मिळू शकते.अधिक माहितीसाठी https://mera.pmjay.gov.in वर संपर्क साधावा.