
रावेर (प्रतिनिधी) : जून महिन्यातील ४, ६ आणि ८ जून रोजी झालेल्या वादळ व गारपिटीमुळे रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाच्या निर्देशानुसार नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असतानाही अद्याप नुकसानभरपाईबाबत ठोस निर्णय झालेला नाही.
यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रावेर तहसील कार्यालयात निवेदन देत तातडीने नुकसानभरपाई मंजूर करण्याची मागणी केली. शासनाने आठवडाभरात भरपाईबाबत निर्णय घेतला नाही, तर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
वादळ आणि गारपिटीमुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विलंब न करता नुकसानभरपाई वितरित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



