
जळगाव (प्रतिनिधी): मुंबईतील वांद्रे परिसरात अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. कारवाईला विरोध करत काही नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली असून यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम सुरू केली होती. सकाळपासून कारवाई सुरू असताना काही ठिकाणी नागरिकांनी विरोध दर्शवला. त्यानंतर परिस्थिती अचानक तणावपूर्ण बनली.
दगडफेकीमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
जखमी पोलिसांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कारवाई पुढे सुरू ठेवली. प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.



