
जळगाव (प्रतिनिधी) : नवकार महामंत्रामध्ये विश्वकल्याणाची अद्भुत शक्ती दडलेली असून, या मंत्राच्या सामूहिक जपामुळे विश्वशांतीला सकारात्मक दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या वतीने ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन NSCI Dome येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आचार्य, साधू-साध्वी तसेच जैन समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय संस्कृती ही विश्वबंधुत्व आणि शांततेचा संदेश देणारी आहे. ‘जिओ आणि जीने दो’ हा जैन धर्मातील मूलभूत विचार संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक ठरतो. नवकार महामंत्र हा या विचारांना बळ देणारा असून, प्रत्येक सजीवामध्ये समानतेची भावना निर्माण करतो.
ते पुढे म्हणाले की, नवकार मंत्राच्या जपातून मनाची शुद्धी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या मंत्राच्या सामूहिक जपामुळे संपूर्ण विश्वासाठी शांतता आणि सद्भावनेचा संदेश दिला जात आहे. हा एक प्रकारचा विश्वशांतीचा महायज्ञ असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवकार मंत्राच्या माध्यमातून पंचपरमेष्ठींना नमस्कार केला जातो, ज्यातून संपूर्ण सृष्टीप्रती आदर व्यक्त होतो. या मंत्रामुळे व्यक्तीच्या विचारांबरोबरच अंतर्मनालाही शांती मिळते. सकारात्मक शक्तींशी जोडणारा हा मंत्र विश्वकल्याणासाठी अत्यंत फलदायी ठरतो, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जैन समाजाच्या भूतदया आणि प्राणीसेवा या मूल्यांचे कौतुक करत मुख्यमंत्री म्हणाले की, जैन समाज केवळ विचार मांडत नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीतही उतरवतो. प्रत्येक जीवाबद्दल संवेदनशीलता जपण्याचा संदेश या समाजातून दिला जातो.




