रसलपूर–आभोडा मार्गावरील वृक्षतोडीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; वन विभागाच्या दुर्लक्षामुळे गंभीर प्रश्न

रावेर (प्रतिनिधी): रावेर तालुक्याला लाभलेला सातपुडा पर्वत, या निसर्गरम्य पर्वतरांगांकडे जाणाऱ्या रसलपूर–आभोडा मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड नेहमीच होत असते मात्र अलीकडेच खानापूर येथे वृक्षतोड झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने पर्यावरणप्रेमी व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम दिवसेंदिवस तीव्र होत असताना, अशा प्रकारची वृक्षतोड म्हणजे पर्यावरणीय समतोलाला दिलेला मोठा धक्का असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
वनराईचे रक्षण करणे व हिरवेगार ठेवण्याचे कर्तव्य निभावणाऱ्या वनविभागावरच प्रश्न निर्माण झालेले आहे, कुंपण शेत खाते या म्हणीप्रमाणे वनविभागाची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे दररोज सातपुड्याच्या रांगांमधून सायकलिंग वर येणारी जळाऊ लाकडे तसेच डिंक गोळा करणारे वनराई कमी करत आहेत वनांमध्ये चरणाऱ्या गुरांच्या बाबतीत तर न विचारलेलेच बरे अशा परिस्थितीत नव्यानेच समोर आलेले प्रकरण म्हणजे
रसलपुर अभोडा रस्त्यावरील ही घटना १४ ऑगस्ट २०२५ रोजी निदर्शनास आली. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे तक्रार केली होती. संबंधित तक्रार वन अधिकाऱ्यांकडे सादर होऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणात वन विभागाची नेमकी भूमिका काय, आणि कारवाईला विलंब का होत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सुमारे ७ ते ८ वर्षांपूर्वी वनपाल राणे यांच्या कारकीर्दीत या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्या काळात ५ कोटी रोपे लावल्याची अधिकृत नोंद असून, परिसर घनदाट जंगल झाल्याचे चित्र दाखवले जात होते. या पाच कोटी वृक्ष मागे करोडोचा भ्रष्टाचार करून फक्त कागदोपत्री नोंदी नक्कीच झाल्या असाव्यात अशी शंकाही व्यक्त करण्यात येत आहे, त्या लावलेल्या वृक्षांची मात्र सध्याच्या स्थिती काय?
त्या वृक्षारोपणाचे प्रत्यक्ष अस्तित्व दिसून येत नसल्याने, हे वृक्षारोपण प्रत्यक्षात टिकले होते की ते केवळ अनुदानाच्या उद्देशाने कागदोपत्रीच दाखवले गेले होते, अशी शंका आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे दोन-तीन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र या निवेदनानंतर कोणतीही ठोस कारवाई किंवा चौकशी सुरू झाल्याचे चित्र अद्याप दिसून आलेले नाही. त्यामुळे या विषयाकडे वन विभागाकडून आवश्यक ती गंभीरता दाखवली जात नसल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये बळावत आहे.
सावली देणारी आणि थंडावा निर्माण करणारा हा मार्ग सध्या उघडा व बोडका दिसत आहे. शेकडो झाडे तोडण्यात आल्याचा दावा. स्थानिकांकडून केला जात असून, ही तोड परवानगीने झाली की बेकायदेशीर, याची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व पर्यावरणप्रेमींनी केली आहे.




