विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव ग्रामीण तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेंतर्गत पात्र सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी शासन निर्णय दिनांक २० ऑगस्ट २०२५ नुसार आपले यूडीआयडी (UDID) कार्ड आधार कार्डशी संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. शीतल राजपूत यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर, ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांनी आपले यूडीआयडी कार्ड व प्रमाणपत्र, अद्ययावत आधार कार्ड तसेच बँक पासबुक यांसह २० फेब्रुवारी २०२६ पूर्वी संजय गांधी योजना शाखा, तहसील कार्यालय, जळगाव येथे कागदपत्रे सादर करून आपली माहिती अद्ययावत करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात ₹२,५००/- अनुदान जमा झाले आहे, त्यांनीदेखील अनिवार्यपणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार, ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून माहिती अद्ययावत केली नाही, त्यांची नोंद अद्ययावत केली जाणार नाही. परिणामी संबंधित लाभाबाबत शासन नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



