
रावेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अमली पदार्थमुक्त अभियानांतर्गत स्वामी एज्युकेशन ग्रुप, रावेर येथे नशामुक्ती जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ओम शांती परिवाराच्या वतीने आयोजित या उपक्रमात शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेतली.
देशाच्या विकासात युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, व्यसनाधीनतेमुळे त्यांचे आरोग्य व भविष्य धोक्यात येऊ नये, तसेच सशक्त, निरोगी आणि जबाबदार नागरिक घडावेत, या उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये नशामुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी डॉ. विजय पाटील व दीपा लोहार (दीदी) यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आपल्या आजूबाजूला व्यसनाधीन असलेल्या व्यक्तींना व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करावे आणि नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने आपली भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नशामुक्त समाजाच्या निर्मितीचा संदेश देणारा हा जनजागृती उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.




