
४ ऑगस्टपासून सात तालुक्यांतील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यान्वित
जळगाव (प्रतिनिधी) : भारतीय टपाल विभागाने डिजिटल युगाशी सुसंगततेने एक क्रांतिकारी पाऊल उचलत ‘ए.पी.टी. (Advanced Postal Technology)’ या नव्या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्र उभारणी आणि डिजिटल उत्कृष्टतेच्या दिशेने चाललेल्या प्रवासात ही एक महत्त्वपूर्ण क्षणिका असून, या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात भुसावळ टपाल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भुसावळ, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा व यावल या सात तालुक्यांतील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये ही सुधारित प्रणाली ४ ऑगस्टपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे.
टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ए.पी.टी. अॅप्लिकेशनच्या माध्यमातून टपाल सेवा अधिक जलद, सुरक्षित, ग्राहकाभिमुख व पारदर्शक होणार आहे. या प्रणालीच्या मदतीने पोस्ट ऑफिसमधील व्यवहारांची प्रक्रिया डिजिटल रूपात अधिक सुलभ होईल. सेवा वितरणाचा वेग वाढेल, तर ग्राहकांसाठी इंटरफेस अधिक सहज व समजण्याजोगा असेल. ही प्रणाली ग्रामीण व निमशहरी भागांतील नागरिकांनाही स्मार्ट व कार्यक्षम सेवा देण्यासाठी विशेष रचलेली आहे.
२ ऑगस्ट रोजी पोस्ट कार्यालयांमध्ये सार्वजनिक व्यवहार बंद
नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीपूर्वीची आवश्यक तांत्रिक कामे सुरळीतरीत्या पार पडण्यासाठी २ ऑगस्ट रोजी या सातही तालुक्यांतील पोस्ट कार्यालयांमध्ये सार्वजनिक व्यवहार बंद राहतील. या काळात कोणतीही टपाल सेवा देण्यात येणार नाही. ही सेवाबंदी केवळ एका दिवसापुरती असणार असून त्यानंतर ४ ऑगस्टपासून नवीन प्रणालीसह सेवा पुन्हा पूर्ववत सुरु होतील.
नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे नागरिकांना भविष्यात अधिक चांगल्या सेवा मिळतील. या छोट्या तांत्रिक व्यत्ययादरम्यान नागरिकांनी सहकार्य करावे व आपल्या व्यवहारांचे नियोजन योग्य वेळी करावे. असे आवाहन डाक अधीक्षक यांनी केले आहे.