
जळगाव (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधित माहितीचे डिजिटायझेशन करून त्यांना अचूक, पारदर्शक आणि जलद सेवा सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने केंद्र सरकारने राबविलेल्या ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेबाबत जिल्हा स्तरावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या सत्राचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भूषवले. त्यांनी जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व डेटा बेस अॅडमिनिस्ट्रेटर (DBA) यांना योजनेच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. या सत्र दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, “ॲग्रीस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांना आधारभूत सेवा सुलभ होतील. महसूल विभागाने या योजनेचा अभ्यास करून गावागावात शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी.”
यावेळी शेतकऱ्यांसाठी तयार केलेली माहितीपट (व्हिडीओ) दाखवण्यात आली, ज्यामध्ये या योजनेची माहिती सोप्या व सुलभ भाषेत समजावून सांगण्यात आली आहे. या माहितीपटाचा उपयोग ग्रामस्तरावर शेतकऱ्यांना योजना समजावून सांगण्यासाठी करण्यात यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. योजनेचे उद्दिष्ट म्हणजे शेतजमिनीची माहिती, पीक नमुना, सिंचन, आर्थिक व्यवहार यांसारखी माहिती एकत्रित व डिजिटल स्वरूपात ठेवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिक जलद, पारदर्शक आणि अचूक पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे होय.