
बायपास पूर्ण होण्यास आणखी दोन महिने? समांतर रस्त्याचे कामही अपूर्ण; नगरसेवक अरविंद देशमुख यांचा NHAI वर संताप
जळगाव (प्रतिनिधी): शहरातील वाहतुकीची परिस्थिती आधीच गंभीर असताना बायपासचे काम अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नसतानाच मानराज पार्कसमोर मार्ग बंद करून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. बायपासचे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी आणखी सुमारे दोन महिने लागण्याची माहिती असताना दुसरीकडे जळगाव महानगरपालिकेचा खोटे नगर ते मानराज पार्क परिसरातील समांतर रस्ताही अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे एकाच वेळी सुरू असलेल्या विविध कामांमुळे वाहतूक नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“बायपास पूर्ण क्षमतेने सुरू नाही, समांतर रस्ता अपूर्ण आहे आणि शहरातील मुख्य मार्गावर आधीच वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. अशा परिस्थितीत मानराज पार्कसमोर रस्ता बंद करून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्याची एवढी घाई कशासाठी?” असा संतप्त सवाल नगरसेवक अरविंद देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
मानराज पार्क, शिव कॉलनी परिसरात वाहतुकीचा ताण
उड्डाणपुलाच्या कामासाठी मार्ग बंद केल्याने मानराज पार्क, शिव कॉलनी आणि खोटे नगर परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आधीच वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता पर्यायी मार्गांवरही गर्दीचा सामना करावा लागत आहे.
देशमुख यांनी सांगितले की, प्रथम बायपास पूर्ण क्षमतेने सुरू करणे, त्यानंतर महानगरपालिकेचा समांतर रस्ता पूर्ण करणे आणि सुरक्षित पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाल्यानंतरच उड्डाणपुलाचे मोठे काम सुरू करणे अपेक्षित होते. मात्र, विविध यंत्रणांची कामे एकाच वेळी सुरू असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे.
“आधीच तीन निवेदने दिली, तरी परिस्थितीत सुधारणा नाही”
शहरातील महामार्गावरील वाहतुकीच्या गंभीर परिस्थितीबाबत NHAI प्रशासनाला यापूर्वीही वारंवार सूचना देण्यात आल्याचा दावा देशमुख यांनी केला. तीन वेळा निवेदने देऊन वाहतूक व्यवस्थेचे गांभीर्य प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले, तरीही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचे त्यांनी म्हटले.
“पाच बळी पुरे झाले, आता आणखी एकही बळी नको,” अशी भूमिका घेत यापूर्वीही तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कामांचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
मानराज पार्क–शिव कॉलनी–खोटे नगर परिसरातील नागरिकांनी सध्याची वाहतूक परिस्थिती लक्षात घेऊन शक्य असल्यास या मार्गावरून प्रवास टाळावा आणि पर्यायी सुरक्षित मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच गर्दीच्या वेळेत वाहनचालकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“विकासकामाला विरोध नाही; मात्र नागरिकांचा जीव धोक्यात नको”
उड्डाणपुलाचे काम होणे आवश्यक आहे आणि विकासकामाला कोणताही विरोध नाही. मात्र, कामाच्या नावाखाली नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणे कदापि मान्य करता येणार नाही, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली.
NHAI अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून निर्णय घेण्याऐवजी मानराज पार्क–शिव कॉलनी–खोटे नगर मार्गावर प्रत्यक्ष पाहणी करून वाहतुकीची परिस्थिती समजून घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि NHAI यांनी तातडीने समन्वय साधून सुरक्षित पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करावी, तसेच बायपास आणि समांतर रस्त्याची स्थिती लक्षात घेऊन उड्डाणपुलाच्या कामाचे नियोजन करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
“जळगावकरांचा जीव नियोजनशून्य प्रयोगांसाठी नाही!”
पाच बळी पुरे झाले… आता आणखी एकही बळी नको!
असा इशारा देत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे




