
माजी खासदार, डॉ. उल्हास पाटील यांची प्रतिक्रिया
जळगाव (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूची बातमी ही अत्यंत धक्का देणारी आहे. संपूर्ण महाराष्ट्रच या घटनेने शोकसागरात बुडाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजकारणातील स्पष्टवक्ता आणि धडाडीचे नेतृत्व होते. चार दशकापासून त्यांनी राज्याच्या राजकारणावर ठसा उमटविला होता. अनेक राजकीय कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांची ज्यावेळी भेट व्हायची त्यावेळी जळगाव जिल्ह्यातील शेती, सहकार याविषयी नेहमीच ते माहिती घ्यायचे.
सकाळी 6 वाजता सर्वसामान्यांना भेटणारा नेता म्हणजे अजित पवार. प्रशासनावर पकड असलेले नेते म्हणून दादांची ओळख होती. शेतकर्यांसाठी संघर्ष यात्रेचे नेतृत्व त्यांनी केले होते. अजितदादांच्या निधनाचे वृत्त हे मनाला चटका लावणारे असून राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दादांसारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही. अशी प्रतिक्रिया माजी खासदार, डॉ. उल्हास पाटील यांनी दिली.
अभ्यासू अन् तरूण कार्यकर्त्यांचा आधार हरपला
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त हे अत्यंत धक्कादायक आहे. भल्या पहाटे अशी दु:खद बातमी महाराष्ट्राला ऐकायला मिळेल अशी स्वप्नातही कुणी कल्पना केली नव्हती. अजितदादा तरूण कार्यकर्त्यांसाठी नेहमीच आधारवड होते. कार्यकर्त्यावर निस्सीम प्रेम करणारे दादांचे नेतृत्व होते. राज्याचा अर्थसंकल्प सर्वाधिकवेळा मांडण्याचा त्यांच्या नावे विक्रम राहिला आहे. अर्थ व नियोजमंत्री म्हणून राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचे काम त्यांनी बारकाईने केले. स्पष्टवक्ता, प्रचंड निर्णयक्षमता, निडर असे त्यांचे व्यक्तीगुण सांगता येतील. दादांच्या अकाली जाण्याने तरूण कार्यकर्त्यांचा आधारस्तंभच कोसळला आहे.
- डॉ. केतकी पाटील, जिल्हा सरचिटणीस भाजपा.




