
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरासह जिल्हाभरात आज, मंगळवारी २७ जानेवारी २०२६ रोजी निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळाला. जानेवारी महिना संपत असताना कडाक्याची थंडी अपेक्षित होती, मात्र निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळे सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने जळगावकरांची मोठी दाणादाण उडवून दिली. या पावसामुळे जिल्हयातील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात विचित्र उकाडा जाणवत होता. मात्र, सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आकाशात काळे कुट्ट ढग दाटून आले आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पावसाला सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागातील टॉवर चौक, आकाशवाणी चौक आणि गोलाणी मार्केट परिसरात पावसाचा जोर अधिक होता. अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यावरील पादचारी आणि दुचाकीस्वारांची सुरक्षित निवारा शोधण्यासाठी एकच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला.
शेती पिकांना मोठा फटका
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जिल्हयातील शेतीला बसला आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि मका ही पिके सध्या जोमात असताना झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच केळी उत्पादक पट्ट्यातही या पावसाने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. काढणीला आलेल्या पिकांचे पाणी साचल्यामुळे नुकसान झाले असून, जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
विक्रेते आणि नागरिकांची तारांबळ
रस्त्याकडेला बसणाऱ्या छोट्या विक्रेत्यांनाही या पावसाचा तडाखा बसला. फळविक्रेते आणि कापड दुकानदारांच्या मालाचे पावसामुळे किरकोळ नुकसान झाले. जळगाव शहरासह नशिराबाद, असोदा आणि लगतच्या परिसरातही पावसाने हजेरी लावली.
आरोग्यावर परिणामाची शक्यता
भर हिवाळ्यात थंडीऐवजी पाऊस पडल्याने वातावरणात आर्द्रता वाढली आहे. या दुहेरी हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते, असा इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे जळगावकर सध्यातरी चिंतेत असून, प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.




