जळगाव मनपा निवडणूक; ‘तुतारी व मशाल’कडून जागा वाटपाचा ‘३८ -३७’ चा फॉर्म्युला ठरला!

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष ३८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष ३७ जागांवर निवडणूक लढविणार आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा केली.
पत्रकार परिषदेत बोलताना संतोष चौधरी म्हणले की, हे जागावाटप दोन्ही मुख्य पक्षांमध्ये झाले असले तरी, आघाडीतील इतर घटक पक्षांनाही सोबत घेतले जाईल. ज्या जागा ज्या पक्षाला सुटल्या आहेत, त्यातून आपल्या मित्रपक्षांना जागा सोडण्याचा निर्णय संबंधित पक्षप्रमुख घेतील. आम्ही इतर लहान पक्षांशी देखील चर्चा करत आहोत, सोयीनुसार जागांची फेररचना केली जाईल, असेही चौधरी यांनी यावेळी नमूद केले.
यांची होती उपस्थिती
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी खासदार उमेश पाटील, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार, एजाज मलिक, शिवसेना (ठाकरे गट) महानगर प्रमुख शरद तायडे, संग्राम पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे निवडणुकीत आता थेट लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.



