जळगावताज्या बातम्यानिवडणूक

सेवा, समर्पण आणि संवेदनशील नेतृत्वाचा चेहरा; तापीबाई राठोड यांची प्रभागातून तयारी

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील प्रभाग १८ सुप्रीम कॉलनी परिसरातून पै. अनिल राठोड यांच्या मातोश्री सौ. तापीबाई रणजीत राठोड या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येत असल्याने परिसरात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. समाजसेवेचा भक्कम पाया, संवेदनशील स्वभाव आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेले थेट नाते हीच त्यांची प्रमुख ओळख मानली जाते.

मागील अनेक वर्षांपासून सौ. तापीबाई राठोड या सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. आजारी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना उपचारासाठी सहकार्य, तसेच अपघातग्रस्तांना तातडीची मदत पोहोचवणे अशी त्यांची सेवा परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवलेली आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे, नातेवाइकांना मानसिक आधार देणे, हे त्यांचे कार्य नागरिकांच्या विश्वासाचे प्रतीक ठरत आहे.

तसेच पोलीस स्टेशनमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी, तक्रारी अथवा गैरसमज समन्वयातून सोडवण्यासाठी त्या नेहमी पुढाकार घेतात. सामान्य नागरिकांना न्याय मिळावा, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जाव्यात, या भावनेतून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावल्याचे नागरिक सांगतात.

धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यातही सौ. तापीबाई राठोड यांचे योगदान उल्लेखनीय आहे. नुकत्याच पार पडलेल्या ह.भ.प. रविकिरण महाराज (दोंडाईचाकर) यांच्या भव्य कीर्तन सोहळ्याला प्रभागातून सुमारे ८ ते १० हजार भाविकांनी उपस्थिती लावली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला कार्यक्रम हे त्यांच्या संघटन कौशल्याचे आणि जनतेच्या विश्वासाचे द्योतक मानले जात आहे.

याशिवाय नेत्र तपासणी शिबिरे, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके व खाऊ वाटप, तसेच महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजऱ्या करण्याचे उपक्रम त्यांनी सातत्याने राबवले आहेत. या उपक्रमांमुळे परिसरात सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव वृद्धिंगत होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सेवा, समर्पण आणि संवेदनशील नेतृत्व या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवणाऱ्या सौ. तापीबाई रणजीत राठोड यांना प्रभागातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या निवडणूक तयारीकडे राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या कटिबद्ध असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button