आरोग्यजळगावताज्या बातम्याराष्ट्रीय-राज्यरोजगारशेतकरी

लिंबू वर्गीय फळांची रोपे प्रमाणित असावी – डॉ. एन. के. कृष्णकुमार

जैन हिल्स येथे ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५चा समारोप 

जळगाव (प्रतिनिधी) : जागतीकदृष्ट्या भारतात लिंबू वर्गीय फळ बागांमुळे शेतकऱ्यांची उन्नती मार्ग सापडत आहे. प्रक्रिया उद्योगातून निर्यात वाढण्यासाठी खासगी संस्था, शैक्षणिक संस्थांसह धोरणकर्त्ये यांनी सामुहिकपणे कार्य केले पाहिजे. रोपांची निगा, झाडांच्या पोषणमूल्यांसाठी आधुनिक सिंचन पद्धती, रोपवाटिकांसाठी लॅबोरेटी प्रमाणपत्र सक्तीकरण, रुफस्टॉक व रोपांमध्ये व्हायरस न जाण्यासाठी प्राथमिक काळजी, शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा यातूनच चांगल्या फळ बागा फुलतिल असे मनोगत माजी डीडीजी हॉर्टिकल्चर डॉ. एन. के. कृष्णकुमार यांनी शास्त्रज्ञांसमोर मांडले.

लिंबूवर्गीय फळ (संत्री, मोसंबी, लिंबू) उत्पादनाला नवी दिशा देण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चर (ISC) आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) च्या समारोपावेळी डॉ. एन. के. कृष्णकुमार बोलत होते.  त्यांच्यासह  बदनापूर मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील मान्यवरांच्या उपस्थितीत सहभागींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. परिश्रम, बडी हंडा व सुबीर बोस हॉल येथे तांत्रिक सत्र झाले. त्यात डॉ. इंद्रमणी मिश्रा यांनी फळबागांमध्ये ड्रोनचा वापर यावर सादरीकरण केले.

डॉ. आशिष वरघणे यांनी जागतिक तुलनात्मक संशोधन पेपर्स सादर केला. सोनल नागे यांनी पर्यावरणपूरक फवारणीवर भाष्य केले. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. एन. के. कृष्णकुमार, उपाध्यक्ष म्हणून डॉ. एम. कृष्णा रेड्डी, डॉ. संदीप सिंग, डॉ. मंजुनाथ, डॉ. आशिष वरघणे उपस्थित होते. बडीहंडा हॉलमध्ये झालेल्या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी एम. एस. लधानिया होते. वेंकटरमन बनसोडे यांनी जागतिक सिट्रस उत्पादनापैकी सुमारे नऊ टक्के उत्पादन भारतात होत असले तरी त्यात अनेक आव्हाने उभी आहेत. हवामान बदल, कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव, दर्जेदार रोपांची कमतरता तसेच दरांतील मोठे चढ-उतार या समस्या उत्पादनाच्या मुळावर घाव घालत आहेत. उत्पादन व प्रक्रिया क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत अधिकाधिक फायदा कसा पोहोचवता येईल, यावरही त्यांनी सविस्तर मांडणी केली.

अश्विनी चापरे यांनी नागपूर परिसरातील सिट्रस संशोधनाची तसेच सिट्रस पिकासाठी विकसित केलेल्या यंत्रांची माहिती दिली. प्रिया अवस्थी यांनी उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड परिसर पूर्वी मागास असतानाही तो आता ‘ऑरेंज सिटी’ म्हणून विकसित होत असल्याबाबतचे सादरीकरण केले. उज्ज्वल राऊत यांनी मँडरिन ऑरेंजपासून ज्यूस तयार करण्यासंदर्भातील संशोधन पेपर सादर केला. देवयानी ठाकरया यांनी आपल्या संशोधन पेपरमध्ये नॅनो पॅकेजिंगचे फायदे व त्याचे सिट्रस उद्योगातील महत्त्व स्पष्ट केले. सुधीर बोस हॉल येथे झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शैलेंद्र राजन होते, तर सहअध्यक्ष म्हणून डॉ. एस. एस. मलानी डॉ. जी. तनुजा शिवराम होते. 

आंध्र प्रदेशातील लिंबूवर्गीय लागवड : स्थिती, मर्यादा आणि संधी या विषयावर डॉ. जी. तनुजा शिवराम यांनी सादरीकरण केले. नाबार्डचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ. एस. एस. मलानी यांनी दर्जेदार लागवड साहित्याच्या उत्पादनासाठी कंटेनराइज्ड लिंबूवर्गीय रोपवाटिका स्थापन करण्यासाठी संस्थात्मक वित्तपुरवठा या विषयावर मार्गदर्शन केले. लिंबूवर्गीय पिकांच्या योग्य वाढीसाठी सक्षम आणि निरोगी रोपे अत्यंत महत्त्वाची असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त नर्सरी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशातील उदयोन्मुख मँडरिन आधारित बागायती पर्यटनाचा सामाजिक आणि आर्थिक परिम या विषयावर ओयिंग जामोह यांनी मांडणी केली.

वाढ, अस्थिरता, शाश्वतता आणि भविष्यातील अंदाज यांच्या एकात्मिक विश्लेषणाद्वारे भारताच्या लिंबूवर्गीय क्षेत्रातील प्रादेशिक वाढीच्या गतिमानतेचे मूल्यांकन या विषयावर सौरभ रॉय यांच्या वतीने त्यांचे सहकारी डाॅ. दर्शन कदम यांनी सादरीकरण केले.  प्रगत सिट्रीकल्चर तंत्रज्ञानाचा अवलंब करून लिंबूवर्गीय शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, महाराष्ट्रातील यशोगाथा यावर आयसीएआयआरच्या शास्त्रज्ञ डाॅ. संगीता भट्टाचार्य यांनी मांडणी केली. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सहयोगी प्रा. डाॅ. गजानन मोरे फळ गळती व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण्यामधील तांत्रिक तफावत यावर मांडणी केली. 

शेतकरी, उद्योजक, शास्त्रज्ञांची चर्चा..

लिंबूवर्गीय फळपिकांच्या क्षेत्रासमोर आज विविध प्रकारची आव्हाने उभी राहिलेली असली तरी त्याचबरोबर मोठ्या संधीही उपलब्ध आहेत. या संधींचा योग्य वापर करण्यासाठी निरोगी रोपे, शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि भरीव गुंतवणूक आवश्यक असल्याचे मत देशभरातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. जैन हिल्स आयोजित राष्ट्रीय लिंबूवर्गीय परिषदेच्या शेवटच्या दिवशी लिंबूवर्गीय क्षेत्राचा विकास : विस्तार, नवोपक्रम, उद्योजकता, धोरणात्मक निर्णय आणि व्यापार प्रगती या विषयावर शेतकरी, उद्योजक, शास्त्रज्ञ, अभ्यासक व धोरणकर्त्ये यांच्या तांत्रिक परिसंवादातून चर्चा करण्यात आली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button