जळगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा थांबवा; अन्यथा ‘मनसे’कडून आंदोलन

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात गौण खनिज व अवैध वाळू उपसा सुरु असून त्यांची सर्रासपणे विक्री होत आहे. हे अवैध वाळू ही धानोरा, म्हसावद, आव्हाणे, खेडी आदी गावातून मोठ्या प्रमाणात गिरणा नदीच्या पात्रातून अत्याधुनिक साधनसामुग्रीच्या मार्फत वाळू काढण्यात येत यावर तात्काळ ५ दिवाचे आत योग्य ती कारवाई होऊन अवैधरित्या होत असलेली वाळू वाहतूक थांबविण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन महसूल प्रशासनाला देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, वाळू माफिया हे इलेक्ट्रॉनिक मशीनच्या सहाय्याने रात्रीच्या सुमारास साधारणत ९ ते ५ या वेळेमध्ये बेसुमारपणे वाळूचे उपसा करुन त्याची मोठ्या हायवा डंम्परने ते रातोरात वाहतूक करुन विल्हेवाट लावीत आहे. असा हा गैरप्रकार वाळू माफिया हे संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग, तलाठी, मंडळाधिकारी, तहसिलदार, प्रांत, प्रांताधिकारी या सर्वांना हाताशी धरुन राजेरोसपणे करीत आहेत. या दोन्ही ठिकाणी तात्काळ महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचे पथक रात्र-दिवस बंदोबस्तासाठी थांबविण्यात यावे जेणेकरुन होत असलेला वाळू उपसाला आळा बसेल.
तसेच धानोरा, मोहाडी या गावांना पिण्याचे पाणी येथून पुरविले जाते. सद्या प्रधानमंत्री जलमिशन योजना अंतर्गत त्याठिकाणाहून वरील गावांना पाणी पुरविणेबाबतचे काम सुरु आहे. परंतु त्याठिकाणाहूनच वाळू माफिया हे मोठ्या प्रमाणात वाळूची उचल करीत असल्याने तेथे पाण्याचा साठाच शिल्लक राहणार नाही, तरी संबंधित गावांना पाणी कसे पुरविले जाईल ? हा मोठा गंभीर प्रश्न आहे.
अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या गाड्यावर कुठल्याही प्रकारेच नेम प्लेट नसतात त्यामुळे संबंधित लोक हे मोठ्या प्रमाणात जोराने आपली वाहने रस्त्यावरुन ने-आण करीत असतात. तसेच अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झाल्यावर देखील संबंधिता विरुध्द काहीएक कारवाई / गुन्हा नोंदविला जात नाही. कारण या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे वर पर्यंत हात असल्याचे ते बोलून दाखवित असतात. तसेच संबंधितांचे वाहन वगैरे जर एखाद्या वेळी अडविण्यात आले तर संबंधितावर सदरील महसूल विभागाचे कर्मचारी हे थातूर-मातूर प्रमाणात कारवाई करुन पंचनामा करुन सदरील वाहने सोडून देत असतात. यामुळे यांची मोठ्या प्रमाणावर मुजोरी व दहशत वाढलेली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी
जळगाव महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगर अध्यक्ष प्रकाश जोशी, उपमहानगर अध्यक्ष ललित शर्मा, जिल्हाध्यक्ष शेतकरी सेना अविनाश पाटील, ॲड. सागर शिंपी, शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भिल यांच्यासह सर्व महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.




