
जळगाव (प्रतिनिधी) : डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) जळगावच्या आय.क्यू. ए.सी.समितीतर्फे शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांसाठी ‘कृतज्ञता सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.व्ही.जे.पाटील हे होते. या सन्मान सोहळ्यासाठी सत्कारमूर्ती म्हणून लेवा एज्युकेशनल युनियन,जळगाव चे सचिव प्रा.व.पु.होले, सहसचिव प्रा. एल.व्ही.बोरोले हे होते.
प्रास्ताविकातून कला व वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ.सत्यजित साळवे यांनी काव्यमय शैलीत सन्मान सोहळा आयोजनाची भूमिका मांडली. प्रारंभी माता सरस्वती, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच लेवा एज्युकेशनल युनियनचे संस्थापक डॉ. अण्णासाहेब बेंडाळे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना संगीत विभागाच्या प्रा.ऐश्वर्या परदेशी यांनी सादर केली. या सोहळ्याचे आयोजन शिक्षक दिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते.
महाविद्यालयातील शिक्षकांसोबत शिक्षकेत्तर सहकारी यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने प्राचार्य डॉ. व्ही.जे.पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त करण्यात आली. त्यामध्ये शिक्षकेत्तर सहकारी जितू चिरमाडे यांनी संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करून, शिक्षकांप्रती गौरवोदगार काढले. यानंतर आय. क्यू. ए. सी. समिती प्रमुख प्रा.डॉ. स्मिता चौधरी यांनी या सन्मानप्रसंगी बोलताना, गुरु -शिष्य परंपरेचा उल्लेख करत आजची शिक्षण पद्धती व विद्यार्थी यावर भाष्य केले. यानंतर हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय रणखांबे यांनी शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, आचारसंहिता,
गुणवत्ता, आधुनिक अध्यापन पद्धती, समाजातील शिक्षकाचे स्थान यावर मुक्तपणे चर्चा केली. त्यानंतर प्रा.राजेश कोष्टी यांनी ‘गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का?’ ही कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
शिक्षक हाच खरा राष्ट्राचा आधारस्तंभ – शिक्षणतज्ज्ञ प्रा.व.पु.होले
यापुढे सत्कारमूर्ती संस्थेचे सहसचिव प्रा.एल. व्ही.बोरोले यांनी भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्यास अभिवादन करून, गुरु शिष्य महिमा वर्णन केले. त्यानंतर संस्थेचे सचिव मा.प्रा.व.पु.होले यांनी मनोगतातून, शिक्षकाची सामाजिक बांधिलकी, शिक्षक- विद्यार्थी नातेसंबंध, शिक्षण क्षेत्रातील सद्यस्थिती, संशोधन क्षेत्रातील विकास, मूल्यसंस्कार, या विषयांवर चर्चा करून शिक्षक हा देशाचा आधारस्तंभ असून आदर्श विद्यार्थी घडविणे हे प्रत्येक शिक्षकाचे कर्तव्य असल्याचे मौलिक विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य प्रा.डॉ. व्ही.जे.पाटील यांनी शिक्षक व शिक्षकेतर सहकारी महाविद्यालयाचा कणा असून, शिक्षकांचे योगदान देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी सर्जनशील पद्धतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता प्रदान करा, असा संदेश मनोगतातून दिला.
या सन्मान सोहळ्यास सर्व शिक्षकेतर सहकारी, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनीसह प्राचार्य, उपप्राचार्य, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, महाविद्यालय नॅक समन्वयक आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. दीपक पवार यांनी केले. तर आभार प्रा.नयना पाटील यांनी मानले.




