
हतनूर धरणातून ५६ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नदीपात्रा जवळच्या गावांना सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून हतनूर धरणाच्या (पूर्णा व तापी नदीच्या) पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस व वाढलेला येवा तसेच धरण पातळीत झालेली वाढ लक्षात घेऊन १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता धरणातून 1598.00 क्युमेक्स (56433.37 क्युसेक्स) इतका प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यासाठी धरणाची ४ गेट पूर्णपणे व १६ गेट प्रत्येकी १.०० मीटर इतकी उघडण्यात आली आहेत.
तापी व पूर्णा नदीकाठी राहणाऱ्या गावातील नागरिकांनी नदीकाठावर न जाणे, पोहणे, मासेमारी करणे तसेच गुरे-ढोरे बांधणे टाळावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी दक्षता बाळगावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच १६ व १७ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पाऊस व विजेच्या तडाख्यामुळे जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतपिकांचे, घरांचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.
प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच महसूल व कृषी खात्याचे अधिकारी यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. बाधित कुटुंबांना तात्पुरते निवारा, अन्न, पिण्याचे पाणी व बिछायतची व्यवस्था करण्यात आली आहे.
तालुक्यात प्रशासनाकडून पाहणी
• अमळनेर तालुका – पातोंडा व नांद्री गावांतील पारधी वस्त्यांना पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना शाळा व स्थानिक भवनात हलविण्यात आले.
• भडगाव तालुका – कनाशी व बोरनार येथे कपाशीचे नुकसान, कोठली येथे ऊस पिकाचे नुकसान.
• रावेर तालुका – नागझिरी नाल्याला पूर; बक्षीपुर येथे घराची भिंत कोसळून सात-आठ शेळ्या दगावल्या.
• जळगाव तालुका – वडली जवखेडे व बोरनार-लमांजन शिवारात पिकांचे नुकसान.
• धरणगाव तालुका – कल्याणे खुर्द येथे नुकसान पाहणी.
• पारोळा व एरंडोल तालुका – विविध शिवारात पिकांची हानी.
• बोदवड तालुका – घरावर झाड कोसळून नुकसान; घरातील व्यक्तींना सौम्य दुखापत.
• पाचोरा तालुका – लासगाव, सामनेर येथे पीकनुकसानीची पाहणी.
जिल्हा प्रशासन तत्पर
आपत्तीग्रस्तांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. शासन ठामपणे आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होतील. मदत वेळेत व पारदर्शकपणे पोहोचविली जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.




