जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये महात्मा गांधींना भावपूर्ण श्रद्धांजली

जळगाव (प्रतिनिधी) : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या मुख्यालयासह देशभरातील सर्व आस्थापनांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
३० जानेवारी १९४८ रोजी संध्याकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी महात्मा गांधी यांची प्रार्थना सभेसाठी जात होते. त्यावेळी नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली होती. यामुळे जैन इरिगेशन कंपनीच्या सर्व आस्थापनांमध्ये संध्याकाळी ५.१७ वाजता दोन मिनिटांचे मौन पाळून गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा अभ्यास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, यासाठी जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी पुढाकार घेतला. त्यांनी जळगाव येथील जैन हिल्स परिसरात गांधीतीर्थची निर्मिती केली. गांधीतीर्थ हे महात्मा गांधी यांच्या जीवनदर्शनाचे देशातील सर्वात मोठे स्मारक व अभ्यास केंद्र आहे. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी मुख्यालयासह भारतातील सर्व कार्यालयांमध्ये श्रद्धांजली अर्पण करत राष्ट्रपित्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.




