
जळगाव (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जळगावात इतिहासाची आठवण जागवणारा आगळा उपक्रम पार पडला. कान्ह ललित कला केंद्र आणि रेडिओ मनभावन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकाळातील सुमारे ३५० वर्षे जुने ऐतिहासिक ‘शिवराई’ नाणे विधिवत पूजन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात शशिकांत वडोदकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर व प्रशासकीय कौशल्यावर प्रकाश टाकला. ‘शिवराई’ हे केवळ नाणे नसून स्वराज्याच्या स्वाभिमानाचे आणि प्रगत अर्थव्यवस्थेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला अमोल देशमुख (संचालक, रेडिओ मनभावन), प्रा. संदीप केदार (जनसंपर्क अधिकारी), आरजे शुभांगी, दिव्या पवार, अक्षरा पाटील तसेच विद्यार्थी उपस्थित होते. शिवरायांचा इतिहास व वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या नाणे पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



